भिडंत सह्यकड्यांची
- आदित्य गोखले
- Dec 16, 2022
- 6 min read
Updated: May 1, 2023
संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतरचा काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा काळ. मोगली अजगर स्वराज्याला आता गिळून टाकणार अशी सगळ्यांची खात्री पटली होती - आणि सुरवातीला असेच काहीसे घडले सुद्धा. स्वराज्याचा छत्रपती मारला गेला आणि नवीन युवा छत्रपतीला स्वसंरक्षणार्थ महाराष्ट्र सोडून जिंजीला जावे लागले. स्वराज्याचा पूर्ण शेवट करायची हीच संधी आहे असं औरंगजेबाने जाणले. पण अशा खडतर काळात मोगलांसमोर खंबीरपणे उभे होते ते मराठ्यांचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम. सर्व मराठी कारभारी आणि सरदार ह्यांनी एकजूट होऊन जमेल तसे आणि जमेल त्या प्रकारे मोगलांचा सामना केला आणि स्वराज्याचा नाश थांबवला. ह्या सगळ्या मंडळींमध्ये लष्करी हालचाली आणि लढायांमध्ये अग्रभागी होते स्वराज्याचे २ रणमर्द - संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव.
६ वर्ष पराक्रमाची शर्थ
१६८९ ला संताजींना रामचंद्रपंतांच्या विनंती व शिफारशीवरून सरनोबत पद देण्यात आले (काव्येतिहाससंग्रह ले.३ पृ ५). तेव्हापासून संताजी आणि धनाजी ह्या जोडगोळीने मोगल प्रदेशात तुफान हैदोस घातला. युद्धाचे क्षेत्र आता नुसते महाराष्ट्र पुरते मर्यादित न राहता कर्नाटक आणि जिंजी-वेल्लोर पर्यंत पसरले होतं. महाराष्ट्रात स्वराज्याची व्यवस्था पाहणाऱ्या रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण ह्यांनी सुरवातीला संताजी-धनाजीना महाराष्ट्रातल्या युद्धात नामजद केले. नंतर दोघांनाही राजाराम महाराजांच्या मदतीला जिंजीचा वेढा तोडण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी आणि मोहीम त्यांनी चोख पार पडली. दोघांच्याही नावाचा दरारा आणि दबदबा मोगली सैन्यात निर्माण झाला - मोगली फौज संताजी आणि धनाजींनी वेगवेगळ्या लढायात पूर्णपणे झोडपून काढली.
समुद्रासारख्या अफाट मोगली फौजेला स्वराज्य संपवणं जमले नाही ह्याच्यात महत्वाचा एक घटक होता संताजी व धनाजी ह्यांची युद्धनीती आणि पराक्रम. संताजी म्हणजे प्रत्यक्ष विजेचा लोळच जणू - शिवाजी महाराजांच्या तालमीत मोठा झालेला आणि त्यांच्या युद्धनीती आणि शिस्तीचे पालन करणारा सच्चा मावळा. संताजींनी कासीम खान, अलिमर्दा खान, हिम्मत खान आणि इतर अनेक मोगल सरदारांच्या केलेल्या पराभवामुळे औरंगजेबाची अनेक वेळा पीछेहाट झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये चौफेर घोडे फेकून दोन्ही महावीरांनी मोगलांना अक्षरशः जेरीस आणले. राजाराम महाराज जिंजीला वेढ्यात सापडले होते आणि परिस्थिती कठीण झाली होती - तेव्हा एकीकडून संताजींनी आणि दुसरीकडून धनाजींनी एकत्रित हल्ला चढवून हा वेढा बहुतांशी उधळून लावला. थोड्या वेळात मोठे अंतर कापणे, गनिमाला कधीही अंदाज येणार नाही अशा ठिकाणी गाठणे आणि गनिमी कावा वापरून गनीम झोडपणे - ह्या गुणांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक व जिंजी-वेल्लोर-तंजोर भागात संताजी-धनाजी जोडगोळीची मोगलांना पक्की दहशत बसली होती. अशा रीतीने १६९० ते साधारण १६९६ च्या सुरुवातीपर्यंतचा युद्ध-काळ संताजी-धनाजींनी गाजवला.
असंतोष , कुरबुर, मतभेद
रामचंद्रपंत-शंकराजींच्या मुत्सद्देगिरी आणि नियोजनामुळे आणि संताजी-धनाजी जोडीच्या अचाट पराक्रमामुळे आता मोगल सैन्याचे धाबे दणाणले होते - असेच चालू राहिले असते तर कदाचित औरंगजेब परत दिल्लीच्या वाटेला लागला असता. पण दुर्दैवाने ह्याच वेळी समोर आली ती संताजी व राजाराम महाराज ह्यांच्यातली भांडणे/मतभेद आणि संताजी व धनाजींमध्ये निर्माण झालेली दुही.
लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे दोघांच्या स्वभावातला फरक. वर वर्णन केल्याप्रमाणे संताजींचा स्वभाव अतिशय कडक आणि शिस्तप्रिय - त्यांच्या ह्या स्वभावाचे सविस्तर वर्णन रियासतकारांनी तसेच खफी खानाने ही केले आहे. अतिशय आक्रमक आणि चलाख प्रवृत्तीच्या संताजींना आपल्या हाताखालच्या मावळ्यांनी केलेली चूक अजिबातच खपायची नाही. कोणी चूक केली तर त्याला कठोर शिक्षा मिळायची. शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे आणि नीतिमूल्यांचे काटेकोर पालन संताजी करत होते - त्यात थोडीही ढिलाई त्यांना पसंत नव्हती.
संताजींच्या आणि इतर कारभारी\सरदारांच्या मध्ये अनेक वेळा काही मतभेद असल्याचे दिसून येते - कदाचित संताजी आणि इतरांच्या स्वभावातला फरक हाच ह्या मतभेदांचा पाया असावा. ह्या अंतर्गत कलहाची पहिली मोठी ठिणगी उडाली ती एप्रिल १६९३ च्या आसपास. डिसेंबर १६९२ मध्ये संताजींनी एका बाजूने आणि धनाजींनी दुसऱ्या बाजूने झुल्फीकारखानाच्या जिंजीच्या वेढ्यातल्या मोगल फौजेवर तुफान हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात मोगल फौजेचे मोठे नुकसान झाले आणि फौज संताजी-धनाजींनी अडवलेल्या रसदीच्या अभावी तडफडू लागली(तारिके दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष ३५). ह्या हल्ल्यातच संताजींनी अलिमर्दा खान आणि धनाजींनी इस्माईल मका अशा मोठ्या मोगल सरदारांना अटक करून जिंजीला आणले(जेधे शक , तारिके दिलकुशा).अशा निर्वाणीच्या स्थितीत जुल्फिकारखानाची फौज असताना त्यांना पूर्णच संपवायचा मोका चालून आला होता. पण त्या वेळी जुल्फिकारखानाने ठेवलेला तहाचा प्रस्ताव राजाराम महाराजांनी मान्य केला आणि खानास वाट दिली(जेधे शक , तारिके दिलकुशा). हा सला बहुदा संताजींसारख्या आक्रमक आणि स्वाभिमानी माणसाला रुचला नसावा. भीमसेन सक्सेना सुद्धा ह्या मुद्द्याला दुजोरा देतो - त्याच्या मते बरेच सरदार सल्याच्या विरुद्ध असतानाही हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ह्या नंतर १६९३ ची जेधे शक. मध्ये एक नोंद आहे - वैशाख मासी संताजी घोरपडे राजारामसि हि बिघाड करून देशासी गेले त्यावरी धनाजी नामजाद केले. संताजींचे राजाराम महाराजांशी भांडणाचे मूळ हे वर म्हणल्याप्रमाणे खानाशी केलेल्या सल्यामध्येच असावे असे इथे वाटते व ते महाराजांवर रुसून जिंजीहुन निघून गेले असं दिसतंय. पण "धनाजीला नामजद केले" म्हणजे नक्की काय हे खुलासा होत नाही - असे वाटते की धनाजींना तात्पुरते सेनापतिपद देण्यासारखा काही विचार\निर्णय झाला असावा. पण प्रत्यक्षात सेनापतिपद संताजींकडेच ठेवण्यात आले असे पुढे १६९५ च्या आसपासच्या पत्रातून दिसते.(राजवाडे खंड ८ - लेखांक ४७)
ह्या नोंदीनंतर १६९४ ची एक महत्वाची नोंद आहे - ती आहे शंकराजी नारायण ह्यांनी संताजींची काढलेली समजूत आणि त्यांना सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे. ते संताजींना झाले गेले मतभेद विसरून परत पहिल्यासारखी राजाराम महाराजांच्या चरणी सेवा करायला सांगतात. ह्या पत्रात २ वाक्य बरेच काही सांगुन जातात - राजश्री स्वामी जवळ मुद्दे घालू नयेति आणि मर्यादेने राहून वेढा उठवावा.(जेधे शक). संताजी एकदम रोखठोक स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि खुद्द राजाराम महाराजांसमोर आपले मुद्देआणि ठाम मतं मांडण्यात ते पुढे मागे बघत नसावे. कोणाचीही भीड न ठेवता अशा थेट मतप्रदर्शनामुळे छत्रपती आणि इतर कारभारी\सरदारांबरोबर मतभेद आणि खडाजंगी होत असावी.
संताजी आणि धनाजी मध्ये थोड्याफार कुरबुरी आणि स्पर्धा पहिल्यापासूनच असावी असे वाटते. राजवाडे खंड ८ मधील संताजींचे १६९५ मध्ये रामचंद्रपंत अमात्यांना लिहिलेले एक पत्र आहे - संताजी अमात्यांच्या अख्त्यारीतच काम करत होते - पण ह्या पत्रातून रामचंद्र पंतांबद्दल असंतोष आणि धनाजींच्या बरोबर असलेली स्पर्धा पुढे येते. संताजी लिहितात - "आम्ही त्याप्रांती असता दहावीसांचे साक्षीनसी ऐकिले की संताजी घोरपडेंस त्याप्रांती ठेऊन राजश्री धनाजी जाधवराऊ यांस पाठवून देणे.....................त्यावरूनच द्वैतप्रकार दिसून आला" . संताजींना कर्नाटक प्रांतातच ठेऊन धनाजींना महाराष्ट्रात पाठवावे असे अमात्यांनी राजाराम महाराजांना सांगितले आणि ह्यातून संताजींसाठीचा दुजाभाव दिसून येतो असे संताजी पत्रात म्हणतात.(राजवाडे खंड ८ - लेखांक ४७)
अशा तर्हेने छोटे-मोठे मतभेद, रुसणे-रागावणे, हेवे-दावे हे सगळे ह्या ६ वर्षात सुद्धा चालूच होते. शेवटी जे होऊ नये ते झालं आणि वर म्हणल्याप्रमाणे ह्या ठिणग्यांचे रूपांतर शेवटी वणव्यात झालं
सह्याद्रीचे दोन कडे आमने सामने
댓글